Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

संगमेश्वर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार सत्यवान विचारे यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान

प्रकाश क्षेत्रातील प्रदीर्घ निष्ठावान आणि समाजाभिमुख योगदानाची दखल

संगमेश्वर प्रतिनिधी :

संगमेश्वर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार सत्यवान विचारे यांना पत्रकारिता क्षेत्रातील प्रदीर्घ, निष्ठावान आणि समाजाभिमुख योगदानाची दखल घेत चैतन्य आर्ट, चिपळूण संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त तसेच आषाढी वारी महोत्सवाच्या तिसऱ्या वर्षाचे औचित्य साधत चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या भव्य रंगमंचावर हा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात आषाढी वारीच्या भक्तिरसपूर्ण वातावरणात झाली.

सुप्रसिद्ध गायिका श्रीमती उत्तरा भागवत साडविलकर तसेच गायक श्री.अमोल बापट यांनी आपल्या सुमधुर आवाजात श्री विठ्ठलाच्या अभंग व भक्तिगीतांचे सादरीकरण केले. त्यांच्या सादरीकरणाने संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले. “जय जय रामकृष्ण हरी”, “जय हरी विठ्ठल” अशा नामघोषांनी उपस्थित वारकरी आणि रसिक मंत्रमुग्ध झाले.

कार्यक्रमाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे चिपळूण येथील महिला मंडळाने सादर केलेली पारंपरिक पालखी मिरवणूक व दिंडी.
.
दिंडीत फुगडी, जात्यावर दळण, पारंपरिक खेळ आणि वारकरी संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध सांस्कृतिक उपक्रम सादर करण्यात आले. विठ्ठल नामाच्या अखंड गजराने आणि टाळ-मृदंगाच्या निनादाने संपूर्ण सभागृह भक्तिमय वातावरणाने भारावून गेले.

यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आल्यानंतर समाज, शिक्षण, पत्रकारिता आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहा मान्यवरांना राज्यस्तरीय ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

या पुरस्कारासाठी संगमेश्वरचे ज्येष्ठ पत्रकार सत्यवान विचारे यांच्यासह यशवंत कुलकर्णी, विनायक कुलकर्णी (कराड, जि. सातारा), राघो ग. अंबावकर (चिपळूण), सुभाष बुरटे (पेठमाप, चिपळूण) आणि अनंत साळवी (पोफळी, चिपळूण) या सहा मान्यवरांची निवड करण्यात आली.

पुरस्कारार्थींना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, आकर्षक स्मृतिचिन्ह (शील्ड) आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले.

या सोहळ्याला चैतन्य आर्ट संस्थेचे अध्यक्ष दत्ताराम निर्मळ, उपाध्यक्ष दिलीप संकपाळ, सचिव अरविंद जोगळे यांच्यासह प्रकाश देशपांडे, बापू काणे, डॉ. प्रणव माळी, दामिनी माळी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
.
तसेच आषाढी वारीच्या भक्तिमय संगीताचा आनंद घेण्यासाठी आणि पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करण्यासाठी चिपळूण व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

  • पत्रकारितेच्या माध्यमातून गेली अनेक दशके सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे, ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सातत्याने मांडणारे आणि समाजहितासाठी निःस्वार्थपणे कार्य करणारे सत्यवान विचारे यांना मिळालेला हा राज्यस्तरीय ‘जीवन गौरव पुरस्कार’ हा केवळ त्यांचा वैयक्तिक सन्मान नसून संगमेश्वर तालुक्याच्या पत्रकारितेचा आणि संपूर्ण तालुक्याचा अभिमान असल्याची भावना यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!