पाणी अडवा, आंबा जगवा! वनौशीत ‘कोकण जलकुंडा’चे धडक प्रात्यक्षिक; ‘कृषिस्नेही’ अन् ‘कृषिसखी’चा भन्नाट उपक्रम




(दापोली- प्रतिनिधी: सागर गोवळे.)
वनौशी:पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते टंचाईच्या काळात आंबा बागेला कसे संजीवनी ठरू शकते, याचा वस्तुपाठच वनौशी येथील शेतकऱ्यांना पाहायला मिळाला! ‘ग्रामीण जागरूकता कार्यानुभव’ (RAWE) कार्यक्रमांतर्गत ‘कृषिस्नेही’ व ‘कृषिसखी’ गटाने प्रत्यक्ष ‘कोकण जलकुंड’ उभारून त्याचे धमाकेदार प्रात्यक्षिक सादर केले.
पावसाच्या प्रत्येक थेंबाचा शेतीसाठी योग्य वापर व्हावा आणि पाणीटंचाईवर मात करता यावी, या मुख्य उद्देशाने हा जनजागृती उपक्रम राबवण्यात आला.
जलकुंडाचे गणित आणि भन्नाट वैशिष्ट्ये
गटातील सदस्यांनी केवळ मार्गदर्शन न करता प्रत्यक्ष मैदानात उतरून ४ मी. × १ मी. × १ मी. आकाराचे जलकुंड तयार करून दाखवले.
साठवण क्षमता: ४ घनमीटर म्हणजेच तब्बल ४,००० लिटर पाणी!
झाडांना आधार: एका आंब्याच्या झाडाला एका सिंचनासाठी २० लिटर पाणी लागल्यास, हे जलकुंड तब्बल २०० झाडांची तहान भागवण्यास सक्षम आहे.
विशेष मार्गदर्शन: जलकुंडासाठी योग्य जागेची निवड कशी करावी, निर्मितीची सोपी पद्धत, पाणी साठवणूक आणि देखभाल कशी ठेवावी, याचे तंत्रशुद्ध धडे शेतकऱ्यांना देण्यात आले.
मार्गदर्शकांची भक्कम साथ
हा यशस्वी प्रयोग सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, ‘रावे’ कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषयतज्ज्ञ डॉ. सचिन पाठक व डॉ. श्वेतांबरी नगरकर, तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कृषिस्नेही व कृषिसखी गटाच्या या ‘झक्कास’ उपक्रमामुळे वनौशीतील शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापनाची एक नवी अन् सोपी दिशा मिळाली असून सर्वत्र त्यांचे भरभरून कौतुक होत आहे!




