दापोलीतील तरुणाची गरुडभरारी: उच्च शिक्षणानंतर शहरात न जाता गावातच उभारला ‘कोकण रत्न गोट फार्म’

(दापोली प्रतिनिधी: सागर गोवळे)
“इच्छा तेथे मार्ग” ही म्हण दापोली तालुक्यातील बोरीवली (आडीवाडी) येथील तरुण उद्योजक करण बैकर यांनी खरं करून दाखवली आहे. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर बहुतांश तरुण शहरांची वाट धरून नोकरीच्या मागे धावतात; मात्र करण यांनी शहरात न अडकता आपल्या मातृभूमीत, कोकणातील ग्रामीण भागातच राहून स्वतःचा उद्योग उभारण्याचा धाडसी निर्णय घेतला.
जिद्द, सततची चिकाटी आणि आधुनिक दृष्टिकोनाच्या जोरावर त्यांनी ‘कोकण रत्न गोट फार्म’ या नावाने आधुनिक शेळीपालन व्यवसायाची यशस्वी पायाभरणी केली आहे. कोकणातील नैसर्गिक वातावरण आणि उपलब्ध साधनसामग्रीचा सुरेख मेळ घालत त्यांनी या पारंपरिक व्यवसायाला तंत्रज्ञानाची जोड देऊन आधुनिक रूप दिले आहे.
गावातच राहून व्यवसाय क्षेत्रात मोठं यश मिळवता येतं आणि स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करता येतं, हे करण यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केलं आहे. त्यांचा हा यशस्वी उपक्रम ग्रामीण भागातील तरुण पिढीला नोकरीच्या मागे न धावता स्वयंरोजगाराकडे वळण्यासाठी नवा मार्ग दाखवणारा ठरत आहे.
करण बैकर यांच्या या प्रेरणादायी आणि ध्येयवेड्या प्रवासाचे बोरीवली गावासह संपूर्ण दापोली तालुक्यातून कौतुक होत आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे कोकणातील इतर तरुणांनाही आपल्याच मातीत नवीन उद्योग उभारण्याची मोठी प्रेरणा मिळत आहे.




