रत्नागिरीतील उर्दू शाळांवर मराठी केंद्र प्रमुख नियुक्ती विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल
एडव्होकेट राकेश भाटकर प्रकरणाची बाजू मांडणार

रत्नागिरी (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये उर्दू माध्यमातील पात्र अधिकाऱ्यांऐवजी मराठी माध्यमातील केंद्रप्रमुखांची नियुक्ती करण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ (प्राथमिक), जिल्हा रत्नागिरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
याचिकेमध्ये नमूद करण्यात आले आहे की, या नियुक्तीमुळे उर्दू माध्यमातील पात्र शिक्षक व अधिकाऱ्यांवर अन्याय झाला असून संबंधित नियुक्ती रद्द करून न्याय्य निर्णय द्यावा. उर्दू माध्यमाच्या शैक्षणिक हक्कांचे संरक्षण, समान प्रतिनिधित्व आणि न्याय मिळवून देण्यासाठी ही कायदेशीर लढाई सुरू करण्यात आल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणाचे नेतृत्व अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ (प्राथमिक) चे राज्याध्यक्ष रिझवान चमन शेख करत आहेत. तसेच रत्नागिरी जिल्हा प्राथमिक अध्यक्ष हिदायत नाईक, शाह नूर कमाल शाह, कोल्हापूरचे उमर जमादार, आसिम पटेल आणि रत्नागिरी संपर्क समितीचे दिलीप देवळेकर हे या कायदेशीर लढ्यात सक्रिय भूमिका बजावत आहेत.
या प्रकरणाची बाजू ॲड. राकेश भाटकर मांडत आहेत. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आशा व्यक्त केली आहे की, सन्माननीय न्यायालय उर्दू माध्यमातील शिक्षकांना न्याय देत या प्रकरणात न्याय्य व समतोल निर्णय देईल.




