वीर देवपाटच्या बारमाही धबधब्यावर पर्यटक येण्यास सोयी, सुविधांसाठी आता शासनदरबारी प्रयत्नांची गरज : वीरकर कुटुंबियांची पुढाकार घेण्याची तयारी ! : खासगी जागा, स्वच्छ व सुरक्षित रस्ता हवा



धनंजय काळे
विशेष प्रतिनिधी
चिपळूण: निसर्गाची मुक्त उधळण आणि बारमाई जलप्रपात यांच्या अदभूत सौंदर्याचा अप्रतिम नमुना असलेला चिपळूण तालुक्यातील वीर गावचा देवपाट धबधबा राज्यभरातील पर्यटकांचे खास आकर्षण ठरला आहे. या धबधब्याला भेट देण्यासाठी गेली अनेक वर्षे पर्यटक येत आहेत मात्र अन्य ठिकाणाना ज्या पध्तीने पर्यटनाच्या सोयी सुविधा त्यांच्या दर्जानुसार सरकार देते तसा प्रयत्न येथे झालेला दिसत नाही.
हा धबधबा ज्यांच्या जागेत आहे त्या जयंत वीरकर आणि त्यांच्या कुटुंबियां कडून होणारे प्रयत्न अपुरे पडत आहेत. त्यासाठी सरकारचे पर्यटन महामंडळ व स्थानिक प्रशासना कइन या ठिकाणी आवश्यक त्या मूलभूत सोयी सुविधा करण्यात याव्या अशी मागणी करण्यात येत आहे
धबधबा आणि तेथील आसपासचा परिसर डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे.
वीर हे चिपळूण तालुक्यातले गाव ! वाहनांची वर्दळ कमी ! घाट उताराचा व धनदाट झाडी, परे, शेती, कातळ, जंगली झाडे, पोफळी व काही प्रमाणात नारळ लागवडीचा हा भाग ! या भागात पोहोचायला ठराविक म्हणजे दोन किंवा तीन गाडया ! सावर्डे, वहाळ, मांडकी वगैरे भागातून एस.टी.चा प्रवास ! शाळकरी मुले, कामानिमित व काही खरेदी निमित चिपळुणात येणारे प्रवासी ! रस्ते लांबलचक ! सध्या त्या ठिकाणापर्यंत पोहोचताना अंतरावर झालेली रस्त्याची चाळण, मराठी शाळांचे काही प्रश्न ! गावात रहाणारी माणसे आणि त्यांचा व्यापार उदीम ! यासर्व गोष्टी सांभाळत ग्रामस्थ ताठ मानेने उभे आहेत. अत्यंत दुर्गम अशा या भागाला आता विकासाचे वेध लागले आहेत.
दळण वळण व्यवस्था अधिक जलद व सुखकर व्हावी यासाठीही प्रयत्न होणे गरजेचे आहे. सध्या मिळालेल्या माहिती नुसार सावर्डे येथून वीरला जायला सकाळी ८ ची, चिपळुणातून दुपारी १२ ची वीरबंदर अशी एस. टो सेवा आहे. दुपारी ३ नंतर तालुक्याच्या ठिकाणी येण्यास गाडी नाही. अशा परिस्थितीतही वीरकर कुटुंबियांनी धबधबा पहायला येणा-यांची ‘ चांगली सोय ठेवली आहे.
जयंतशेठ, अजितदादा, सौ. जान्हवी ताई, त्यांच्या सर्व कुटुंबियांनी आलेल्या पर्यटकांना धबधबा परिसर फिरविणे, खानपान व निवासव्यवस्था ठेवली आहे.




