राणेवाडीत आंबा कलम बांधणी प्रात्यक्षिकाचे यशस्वी आयोजन; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


(दापोली: प्रतिनिधी-सागर गोवळे.)
पंचनदी:आंबा पिकातील उत्पादनवाढीसाठी योग्य कलम पद्धतीचे महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने पंचनदी परिसरातील राणेवाडी येथे आंबा कलम बांधणीच्या प्रात्यक्षिकाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक पार पडले. कृषी महाविद्यालयातील कृषी सहाय्यक श्री. दिनेश येलवे यांनी उपस्थितांना आंबा कलम बांधणीची प्रत्यक्ष कृती करून दाखवली. त्यांनी कलमासाठी योग्य खुंट आणि कलमकाडीची निवड कशी करावी, कलम बांधण्याची अचूक पद्धत, त्यासाठी लागणारी साधने आणि कलम यशस्वी होण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रात्यक्षिकानंतर शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे श्री. येलवे यांनी निरसन केले, ज्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार रोपे स्वतः तयार करण्याचे तांत्रिक ज्ञान मिळाले.
हा कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. गार्गी शिर्के, प्राध्यापक डॉ. निलेश दळवी, डॉ. सुमेध थोरात व डॉ. प्रज्ञा गुडदे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रेया कर्पे, उन्नती धोडी, निशा घोरपडे, स्वप्नाली जाधव, कोमल कडू, गायत्री कुंभार, रसिका मासये, समृद्धी आंबेकर, अदिती आंब्रे, श्रुती गोरीवले, सानिया राहटे, प्राची येलवे आणि सोनाली खर्चे यांनी विशेष परिश्रम घेतले.




